नर्मदा नदीची पायी परिक्रमा करण्याची अनेक जणांना इच्छा असते. पण दीर्घ कालावधी आणि मार्गातील अडचणींबद्दल शंका असते. या शंकांचे निरसन मधुकर संत यांच्या ‘नमामि मातृ नर्मदे’ या पुस्तकातून होते.
लेखक, त्यांचे बंधू, बहीण, मेव्हणे या साठीच्या आसपास असलेल्या चौघांनी तीन हजार किलोमीटरची ही परिक्रमा १३३ दिवसांत पूर्ण केली. मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर येथून प्रारंभ केल्यापासून परिक्रमेतील प्रत्येक दिवसाची रोजनिशी यात दिली आहे. परिक्रमेतील नर्मदामैयाचे महत्त्व यातून सांगत तिच्या सहवासातील अनुभव कथन केले आहे.
परिक्रमेतील सांकेतिक शब्द, मार्गात भेटणारे साधू महाराज, त्यांचे आदरातिथ्य, सामान्यांना कळणारी आस्था कळते. मार्गात अगदी पाय दुखण्यापासून आलेले अनेक अडथळे, संकटे व मैयाच्या ओढीने त्यावर केलेली मात याबाबत वाचताना वाचकांच्या मनातही परिक्रमेबद्दल कुतूहल निर्माण होते. तारीख व वर असलेल्या या रोजनिशीत रोजचा दिवस, निघण्याचे ठिकाण व वेळ, त्या दिवसात कापलेले अंतर व लागेल कालावधी, पोहोचण्याचे ठिकाण व वेळ, पहिल्या दिवसापासून चाललेले अंतर याचीही नोंद दिली आहे.
करवीर तालुक्यातील (जि. कोल्हापूर) उजळाईवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाने २०१५-१६ सालच्या उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती ग्रंथ पुरस्कारासाठी ‘नमामि मातृ नर्मदे’ या पुस्तकाची निवड प्रवासवर्णन या प्रकारात केली होती. हा पुरस्कार बिहारचे तत्कालीन राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला होता.
पुस्तक : नमामि मातृ नर्मदे
लेखक : मधुकर संत
प्रकाशक : मयुरेश मधुकर संत
पाने : ३६७
किंमत : ३५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)